पोस्टल तिकिटाच्या माध्यमातून सोलापूरातील चार हुतात्म्यांचा इतिहास जगासमोर येईल : केंद्रीय संचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांचे प्रतिपादन, स्‍वातंत्र्याच्या अमृत महोसत्‍वानिमित्‍त "अनसंग हिरो" ना सरकार प्रकाशात आणतयं - दैनिक शिवस्वराज्य सोलापूर

पोस्टल तिकिटाच्या माध्यमातून सोलापूरातील चार हुतात्म्यांचा इतिहास जगासमोर येईल : केंद्रीय संचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांचे प्रतिपादन, स्‍वातंत्र्याच्या अमृत महोसत्‍वानिमित्‍त "अनसंग हिरो" ना सरकार प्रकाशात आणतयं




समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर, दि. २: पोस्टल तिकिटाच्या माध्यमातून सोलापुरातील चार हुतात्म्यांचा इतिहास जगासमोर येईल, स्‍वातंत्र्याच्या अमृत महोसत्‍वानिमित्‍त 'अनसंग हिरो' (unsung hero) ना सरकार प्रकाशात आणतयं, असे प्रतिपादन केंद्रीय संचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांनी आज येथे केले.

भारतीय पोस्ट विभागाच्यावतीने सोलापूरच्या चार शहीद हुतात्मा मल्लाप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, श्रीकिसन सारडा आणि अब्दुल रसूल कुर्बान हुसेन या हुतात्म्यांवरील पोस्ट तिकिटाचे अनावरण नियोजन भवन येथील सभागृहात श्री. चौहान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. भारतीय डाक विभाग, परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्था व सोलापूर सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. व्यासपीठावर खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी, महापौर श्रीकांचन यन्नम, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, मुख्य पोस्टमास्तर जनरल हरिश्चंद्र अग्रवाल, पोस्टमास्तर जनरल जी मधुमिता दास, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व महापालिका आयुक्त पि. शिवशंकर आदी उपस्थित होते. अकोल्याचे खासदार संजय धोत्रे हे ऑनलाइन कार्यक्रमात सहभागी झाले होते. तसेच कार्याक्रमासाठी हुतात्‍मांचे वारस अन्‍नपूर्णा धनशेट्टी सहभागी झाल्‍या होत्‍या. 

श्री. चौहान यांनी सांगितले, स्‍वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधानाने देशातील अनसंग हिरोंना प्रकाशित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याच माध्यमातून सोलापूरच्या या चार हुतात्म्यांच्या पोस्ट तिकिटाचे अनावरण झाले असून आता यांचा इतिहास संपूर्ण देशभरात जाईल. ब्रिटीशांनी दहशत निर्माण करण्‍यासाठी या चार हुतात्म्यांना सोलापूरातील यात्रेच्‍या काही दिवस अगोदर फाशी देण्‍यात आली. परंतु हा देशभक्‍तीचा लढा मोठया हिमतीने देशवासियांनी लढल्‍याने देशाला स्वातंत्र्य मिळाले. म्‍हणुन आपण भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. यानिमित्‍त देशसेवेसाठी वीज, पाणी आणि वृक्ष यांचे लोकसहभागातून संवर्धन करा. सोलापुरात वेगवेगळे उपक्रम हाती घ्या, 75 रक्तदान शिबिरे भरवा, 75 मेडिकल शिबिर घ्या,  75 हजार वृक्ष लागवड करण्याचा मानस करा, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी म्हणाले, सोलापूरच्या चार हुतात्म्यांचा इतिहास हा सुवर्ण अक्षराने लिहिणारा आहे मात्र तो उजेडात आलेला नाही. आमदार देशमुख यांनी मागणी केल्याप्रमाणे हा इतिहास पुस्तकांमध्ये प्रकाशित करण्याबरोबरच सोलापूर जिल्ह्याला तीर्थक्षेत्र म्हणून केंद्र सरकारने मान्यता द्यावी, अशी मागणी मंत्री त्यांनी केली.

श्रीमती यन्नम म्‍हणाल्‍या, स्वातंत्र्याच्या सतरा वर्ष अगोदर सोलापूरातील क्रांतीकारांनी ब्रिटीशांना पळवून लावून तीन दिवस स्वातंत्र्य मिळाले होते. तसेच सोलापूर नगरपालिकीवरती पहिल्‍यांदा शासकीय इमारत म्‍हणून तिरंगा ध्‍वज फडकिवला होता. हा शहराचा गौरवशाली इतिहास असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

आमदार देशमुख म्हणाले, सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून चार हुतात्म्यांचा इतिहास अधिक लोकांसमोर येण्‍यासाठी फाउंडेशनच्या वतीने वेब सिरीज तयार करण्यात येत आहे. त्याचबरोबर हा इतिहास सरकारच्यावतीने पुस्तकांमध्ये अभ्यासक्रमात घ्यावा, अशी अपेक्षा त्‍यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्‍या सुरूवातीला चार हुतात्म्यांवरील डाक्‍युमेंट्रीचे प्रसारण करण्‍यात आले. मुख्य पोस्टमास्तर जनरल हरिश्चंद्र अग्रवाल यांनी प्रस्‍ताविक केले तर अमृता अकलूजकर यांनी सूत्रसंचालन केले. मधुमिता दास यांनी आभार मानले.
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads